“यशवंत विचारांचा वारसा, विकासाचा निर्धार; खर्शी–बारामुरेत विठ्ठल गोळेंचे रणशिंग” “हक्काच्या मातीची हाक, जनतेच्या सेवेसाठी झुंजार लढत; विश्वास, निष्ठा आणि विकासाचा नवा अध्याय!”
“हक्काच्या मातीची हाक, जनतेच्या सेवेसाठी झुंजार लढत; विश्वास, निष्ठा आणि विकासाचा नवा अध्याय!”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी पंचायत समितीच्या खर्शी–बारामुरे गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विठ्ठल गोळे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रणांगणात ठामपणे प्रवेश केला आहे. यशवंत विचारांच्या प्रभावातून प्रेरणा घेत, जनतेच्या विश्वासावर आणि समर्थ साथीच्या बळावर गोळे यांनी या गणातून रणशिंग फुंकले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विठ्ठल गोळे यांची ओळख आहे. महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस म्हणून त्यांनी केलेले संघटनात्मक आणि सामाजिक कार्य राज्यभर परिचित आहे. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा हा नेता आता मात्र “आपल्या हक्काच्या गावाची माती” या ओढीने पुन्हा एकदा स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
“आपला हक्काचा माणूस, आपल्या माणसांसाठी” या भावनेतून ही निवडणूक लढवत असल्याचे गोळे यांनी स्पष्ट केले आहे. खर्शी–बारामुरे गणातील विकास, रोजगार, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
“यशवंत विचारांचा वारसा जपून, यशवंत विकासाचे स्वप्न घेऊन, जनतेच्या सेवेसाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत,” अशी ठाम भूमिका विठ्ठल गोळे यांनी मांडली. त्यांच्या उमेदवारीमुळे गणात राजकीय वातावरण तापले असून नागरिकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विकास, विश्वास आणि निष्ठेच्या त्रिसूत्रीवर उभ्या असलेल्या या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

